Headlines :
Featured Post Today
print this page
Latest Post

आशा भोसलेंना अक्षय मोहंती सन्मान


भुवनेश्‍वर - प्रख्यात पार्श्‍वगायिका आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाच्या अतिशय प्रतिष्ठेच्या अक्षय मोहंती सन्मानसाठी निवड करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि कार्याचा गौरव करणारे विशेष पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रख्यात ओरिया गीतकार आणि संगीतकार अक्षय मोहंती यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या १२ ऑक्टोबर रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी मन्ना डे, गुलजार आणि इलिया राजा यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
स्रोत: तरुण भारत, 10/9/2011 http://vrittabharati.in/
0 comments

अडवाणी करणार दररोज ३०० किलोमीटर यात्रा

पटणा, १० ऑक्टोबर
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा ११ ऑक्टोबरपासून बिहारच्या छपरा जिल्ह्यातील सिताबदियारा येथून सुरू होणार आहे. या यात्रेदरम्यान अडवाणी दररोज ३०० किलोमीटर यात्रा करणार असून दररोज किमान तीन ठिकाणी ते जनसभेला संबोधित करणार आहेत.
अडवाणी यांच्या रथयात्रेला लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मस्थळ सिताबदियारावरून बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार हिरवी कंदिल दाखवणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात असणार्‍या या रथयात्रेदरम्यान अडवाणी भ्रष्टाचार, महागाई या मुद्यांबरोबरच विदेशात जमा असलेले काळे धन परत आणण्यावर भर देण्यात येणार आहे. अडवाणी आपल्या ४० दिवसांच्या यात्रेत २३ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशातील सुमारे १०० जिल्ह्यांना भेट देणार असल्याचे या यात्रेचे आयोजक रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.
स्रोत: तरुण भारत, 10/10/2011 http://vrittabharati.in/
0 comments

अडवाणींचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल


नवी दिल्ली - लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मस्थळावरून आपली रथयात्रा सुरू करण्यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भ्रष्टाचारविरोधी रथयात्रा काढत असलेल्या अडवाणी यांनी युपीए सरकार भ्रष्टाचारासाठी जबाबदार असल्याचे सांगितले आहे. या सरकारच्या काळात लोकशाहीची हानी झाली असून सर्वत्र भ्रष्टाचार फोफावलेला दिसत आहे. हेच कारण आहे की देशातील जनतेत असंतोष व संताप भरलेला आहे. परदेशात असलेला काळा पैसा भारतात परत आणण्यात सरकारने जी निष्क्रियता दाखवली आहे त्यामुळे जनतेत या सरकारविषयीचा विश्‍वास कमी झाला आहे.
रथयात्रेपूर्वी दिल्लीत एका पत्रपरिषदेत बोलताना अडवाणी म्हणाले की रथयात्रेदरम्यान भ्रष्टाचाराच्या मुद्याबरोबरच महागाई, निवडणूक सुधारणा या मुद्यांवरदेखील भर देण्यात येणार आहे. काळा पैसासंदर्भात श्‍वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करत रथयात्रेत विदेशातील काळा पैसा परत आणण्यासंदर्भात व यात गुंतलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले.
स्रोत: तरुण भारत, 10/10/2011 http://vrittabharati.in/
0 comments

गझल सम्राट जगजीतसिंह कालवश

 मुंबई - प्रख्यात गझल गायक जगजीतसिंह यांचे आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
जगजीतसिंह यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या मखमली आवाजामुळे गझल गायकीत त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही गाणे गायले होते.
जगजीतसिंह यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानच्या गंगानगरमध्ये झाला होता. बालपणीच त्यांना संगीताचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला होता. १९६५ मध्ये ते मुंबईत आले आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला. आपल्या मेहनतीने त्यांनी चित्रपटसृष्टीत लवकरच आपले स्थान निर्माण केले. आपल्या गाण्याच्या शैलीने त्यांनी रसिकांना भुरळ घातली आणि रसिक त्यांच्या गाण्याचे दिवाने झाले. सामान्य माणसाला गझलची आवड जगजीतसिंह यांच्यामुळे निर्माण झाली. गझलसारखा कठीण उर्दूतला प्रकार त्यांनी रसिकांसाठी उलगडून दाखवला.
‘प्रेमगीत’, ‘अर्थ’ या चित्रपटातील गाणी कोण विसरू शकेल. त्यांनी अनेक गझल अलबम तयार केले. त्यांच्या प्रत्येक अलबमने यशाचे शिखर गाठले. आपल्या एकुलत्या मुलाच्या निधनाने कोलमडलेले जगजीतसिंह पुन्हा बळाने उभे राहिले आणि त्यांनी संगीतक्षेत्रात आपले संशोधन सुरू केले. त्यांचे संगीतक्षेत्रातील योगदान अमूल्य आहे.

गझल प्रकाराला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यात जगजीतसिंह यांचे मोठे योगदान होते. त्यांनी ५० पेक्षा जास्त अलबममध्ये गाणी गायली आहेत. त्यात गझलचे प्रमाण जास्त आहे. तुमको देखा तो ये खयाल आया, होठों से छुलो तुम मेरा गीत अमर कर लो, वो कागज की कश्ती वो बारीश का पानी या त्यांच्या गझल फारच लोकप्रिय झाल्या. हिंदीबरोबरच त्यांनी पंजाबी, बांगला, उर्दू, गुजराती, सिंधी आणि नेपाळी भाषेत गाणी व गझल गायल्या आहेत. २००३ मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्भूषण पुरस्काराने सन्मानित केले.


गझल गायकीला नवा आयाम देणार्‍या या सम्राटाला अभिवादन.
स्रोत: तरुण भारत, तारीख: 10/10/2011  
0 comments

लोकमनावर अधिराज्य गाजवणारा आवाज

सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते.
त्यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला.
आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर, आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले.
इ.स. १९५७- इ.स. १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले.
ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. इ.स. १९६० च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूँ ) हे गाणे; इ.स. १९६५चे ‘जाइंये आप कहाँ’ (मेरे सनम); इ.स. १९६८ मधले ‘वो हसीन दर्द देदो’ (हम साया); चैन से हमको कभी -अशी मदहोश करणारी गाणी रसिकांच्या हृदयावर राज्य करायला लागली.
राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना ‘पिया तू अब तो आजा’ हे इ.स. १९७१ चे कारवाँ चित्रपटातील गीत, इ.स. १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे इ.स. १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे, ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. इ.स. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन आँखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला इ.स. १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही इ.स. १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी, सगळेच विलक्षण!
त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार, ते गीतकार, त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज - या सर्वांच्या परस्परसंबंधांचे संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.
हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.
नाच रे मोरा, आईए मेहेरबाँ, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहाँ पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश... ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीत्गे, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गाऊ शकतात.
कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, स्वीडन आदी अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम, ‘राहुल अँड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईसबरोबरचे काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा अँड फ्रेन्ड्‌स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. अभिजात संगीत कलेला जसे स्थळ-काळ-वेळाचे बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचेच बंधन नाही.
राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.
आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्‍या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणार्‍या ,किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणार्‍या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.
0 comments

वाह उस्ताद...!

उस्ताद झाकीर हुसेन आणि त्याची जुगलबंदी रंगत जाते, दोघांचीही बोटं तितक्याच ताकदीने तबल्यावर थिरकतात, कोणीही मागे हटायला तयार नाही, अखेर समाधानी चेहऱ्याने झाकीर हुसेन म्हणतात 'वाह उस्ताद!' आणि त्यावर तो मुलगा म्हणतो, 'अरे हुजूर, वाह ताज बोलिये!' आठवते ती जाहिरात? ब्रूकबॉण्डच्या जाहिरातीतील तो लहान मुलगा म्हणजे आजचा आघाडीचा संगीतकार आदित्य कल्याणपूर...
घरात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शास्त्रीय संगीताची कास धरून आदित्यने केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आपला ठसा उमटवला आहे. आदित्यचे वडील मेकॅनिकल इंजिनीअर, तर आई बालमोहन शाळेत कम्प्युटर डिपार्टमेंटची विभागप्रमुख. मात्र आपल्या मुलाला संगीताची, विशेषत: तबल्याची आवड आहे; हे त्यांनी जाणलं होतं. 'मी डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावं, अशी अपेक्षा माझ्या आई-वडिलांनी कधीच केली नव्हती आणि ते माझ्य दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं,' आदित्य अभिमानाने सांगतो.
साधारणपणे तीन वर्षांचा असतानाचा एक प्रसंग आदित्य आवर्जून नमूद करतो. 'एकदा चुकून माझा पाय तबल्याला लागला, तेव्हा आई मला ओरडली आणि तिने मला तबल्याला नमस्कार करायला सांगितला. तबल्यात देव असतो, असं तिने मला सांगितलं. त्यावर मी तिला विचारलं, कुठे आहे देव? ती म्हणाली तो तबल्याच्या आत असतो, दिसत नाही. त्यानंतर काही दिवसांनी तिला तबला फुटलेला दिसला. तिने मला विचारलं, तेव्हा मी सांगितलं, की मी तबला फोडला. कारण मला देव बघायचा होता. यावर तिला हसावं की रडावं तेच समजेना.' असं तबल्याशी आदित्यचं नातं जुळलं.
अगदी लहान असल्यापासून आदित्यला तालाचं ज्ञान होतं आणि हे त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी आदित्यला तबल्याचं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या सातव्या वषीर् आदित्यने उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडे तबला शिकण्यास सुरुवात केली. 'वाह ताज'च्या जाहिरातीसाठी त्यांनीच आदित्यचं नाव सुचवलं होतं. शाळा, कॉलेज सुरू असतानाच आदित्यने उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबरोबर कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. कॉलेज म्हणजे फक्त आईच्या समाधानासाठी होतं, असं तो सांगतो. मात्र शाळा-कॉलेजमध्येही तो विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असे. अनेक स्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. कॉलेज फेस्टिवल हे तरुणांना आणि त्यांच्या करियरला दिशा देणारे असतात, असं त्याला वाटतं. सिडनहॅम कॉलेजमध्ये दोन वर्षं शिकल्यानंतर मिठीबाई कॉलेजने त्याला स्वत:हून कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची विनंती केली होती. त्याने ती स्वीकारलीदेखील. कॉलेजातील त्याच्या बरोबरीची मुलं जेव्हा मजा करत होती, तेव्हा आदित्य दिवसाचे किमान ८ ते १० तास रियाज करत होता, कॉन्सर्ट करत होता.
आदित्यने आत्तापर्यंत उस्ताद झाकीर हुसेन, पंडित जसराज, उस्ताद अमजद अली खान, डॉ. प्रभा अत्रे, पंडित शिवकुमार शर्मा, शंकर महादेवन, ए. आर. रहमान अशा अनेक दिग्गजांबरोबर काम केलंय. त्याबद्दल बोलताना आदित्य म्हणतो, 'या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती. या महान कलाकारांबरोबर काम करताना प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि ती संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे.'
माझ्या गुरूंनी मला केवळ तबला शिकवला नाही, तर एक चांगला माणूस म्हणून जगणं शिकवलं आहे, असं तो सांगतो. पंजाब घराण्याची परंपरा पुढे चालवणाऱ्या आदित्यकडे उस्ताद झाकीर हुसेन यांचा वारसदार म्हणूनही पाहिलं जात आहे.
शास्त्रीय संगीतात करियर करणाऱ्या तरुणांची संख्या आजही खूप कमी आहे, आदित्यने मात्र ते धाडस केलं. तबल्याचा प्रसार करण्यासाठी त्याने अमेरिकेत 'न्यू इंग्लंड स्कूल ऑफ म्युझिक' स्थापन केली आहे. आजवर हार्वर्ड, एमआयटी, कॉनेर्ल, कोलंबिया, येल, बोस्टन, अशा अनेक युनिव्हसिर्टीजमध्ये त्याने आपली कला पेश केली आहे. हार्वर्ड विद्यापीठाची संगीत म्युझिक स्कूल आणि बोस्टनमधील रंगांजली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये त्याला शिकवण्याचीही संधी मिळाली. एस्टोनियातील नावाजलेल्या 'ओरिएण्ट आर्ट फेस्टिव्हल'मध्ये तबलावादन करणारा आदित्य हा पहिला कलाकार आहे. जगभरातील नावाजलेल्या फेस्टिव्हल्समध्ये आदित्यने परफॉर्म केलं आहे. पण हे सगळं करताना रियाज, नवनवीन गोष्टी शिकणं, प्रयोग करणं, या गोष्टी आदित्यने सुरूच ठेवल्या. कॅन्सरमुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर आदित्यने मुंबईत 'शामल म्युझिक फाऊंडेशन'ची स्थापना केली आहे. कॅन्सर पेशंटसाठी ही संस्था विविध उपक्रमांद्वारे निधी गोळा करते.
भारतीय कलांची परंपरा अतिशय समृद्घ आहे. अनेक दशकांपूवीर् होऊन गेलेल्या कलाकारांना आजही आपण ऐकतो, म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी 'ग्रेट' केलं आहे. पण त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे ती महान परंपरा तरुणांनीच जपली पाहिजे. शास्त्रीय संगीतात करियर करायचं असेल, तर वेळ देणं अतिशय गरजेचं आहे. सध्याच्या रिअॅलिटी शोजमधून संगीत शिकता येणार नाही, असं तो सांगतो. ते केवळ दिखाऊ आहे. खरोखर संगीत शिकायचं असेल, तर त्यासाठी साधना केली पाहिजे. शास्त्रीय संगीत जगवायचं असेल, तर तरुणांनी ते ऐकलं पाहिजे, असं तो सांगतो.
' सूर सिंगार समिती'ने आदित्यला 'ताल मणी' हा किताब बहाल केला आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आलं आहे. पुढील वषीर् तो स्वत:चा पहिला सोलो अल्बम लॉँच करणार आहे. संगीताला आयुष्य समपिर्त केलेल्या आणि गुरुंची शिकवण जपणाऱ्या आदित्यला पुढच्या प्रवासासाठी हवे आहेत केवळ रसिकांचे आशीर्वाद!
स्नेहल जोशी-कुळकर्णी
0 comments

मानवतेचा संगम 'कुंभमेळा'

भारतीय संस्कृतीत कुंभमेळ्याचे खूप महत्त्व आहे. पुरणानुसार हा एकमात्र मेळावा, सण व उत्सव आहे की त्यात मानवतेचा संगम झालेला दिसतो. हिंदुबांधव एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करतात. भारतीय संस्कृतीत ही परंपरा फार प्राचीन आहे. त्याचा उल्लेख आपल्याला पुराणात सापडतो. प्राचीन काळी ऋषीमुनी नदीकाठी एकत्र येऊन मोठे अध्‍यात्मिक कार्य करत असत तसेच एखाद्या रहस्यावर विचार विनीमय करत असत. आजही ही परंपरा कुंभमेळ्याच्या रूपाने सुरू आहे. संपूर्ण भारतातून लाखो भाविक गंगा नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी हजेरी लावत असतात.
कुंभमेळा आयोजनामागे वैज्ञानिक कारण असू शकते. कारण जेव्हा जेव्हा कुंभमेळ्याला सुरूवात होते. तेव्हा सूर्यामध्ये काही ना काही बदल होत असतो आणि त्याचा परिणाम पृथ्वीवर जाणवत असतो. प्रत्येक अकरा, बारा वर्षांच्या अंतराने सूर्यमध्ये परिवर्तन होत असते.
कुंभमेळा भारतातील सगळ्यात मोठा धार्मिक सोहळा आहे. भारतभरातून लोखो नागरिक कुंभमेळ्यात हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. इतक्या मोठ्या संख्येने हजयात्रेत मक्का येथे मुस्लीम बांधव एकत्र येत असतात. या दोन मोठ्या धार्मिक सोहळ्यात एकत्मतेचा व मानवतेचा संभम होत असतो.
प्रत्येक तीन वर्षांनंतर एक असे बारा वर्षांत चार वेगवेगळ्या तिर्थक्षेत्रावर चार कुंभमेळ्यांचे आयोचन होत असते. अर्धकुंभ मेळा प्रत्येक सहा वर्षांत हरिद्वार व प्रयाग येथे भरतो तर पूर्णकुंभ बारा-बारा वर्षांच्या अंतराने केवळ प्रयाग येथे भरत असतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा तब्बल 144 वर्षांनंतर हरिद्वार (इलाहाबाद) येथे भरत असतो.
कुंभमेळ्याची कथा-
'कुंभ' या शब्दाचा अर्थ म्हणजे 'कळस' होय. समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाले होते. त्यावरून देव व दानव यांच्यात युध्द झाले होते. युध्दात अमृतकुंभातील चार थेंब जमीनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, तेथे प्रत्येक बारा वर्षांत एकदा कुंभमेळा भरतो. बारा वर्षात एकदा आयोजित करण्‍यात येणार्‍या कुंभमेळ्याला महाकुंभ मेळा असे म्हटले जाते.
कुंभमेळ्याचे आयोजन स्थान-
हिंदू धर्मग्रंथानुसार इंद्राचा मुलगा जयंतच्या कळसातून अमृताचे चार थेंब भारतात चार जगी पडले. पहिला हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा उज्जैन येथील शिप्रा नदीत, तिसरा नाशिक येथील गोदावरी व चवथा प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्याच्या संगमावर पडला होता. आज ही चार स्थळे तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द असून येथे कुंभमेळा भरतो. लाखो भाविके त्यात‍ सहभागी होऊन पवित्र स्थान करतात.
ज्योतिष महत्त्व-
कुंभमेळा आणि नऊग्रह यांचा फार जवळचा संबंध आहे. जेव्हा अमृतकुंभातून अमृत पृथ्वीवर पडले होते, तेव्हा जी ग्रहाची स्थिती होती तशीच स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन केले जात असते. हा योग प्रत्येक बारा वर्षांनंतर येत असतो.
अमृताचे थेंब पृथ्वीवर पडल्याने तेव्हा सूर्य, चंद्र, गुरु व शनि या ग्रहांनी अमृतकुंभाच्या रक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे ज्या वर्षी ज्या राशीत सूर्य, चंद्र व गुरू अथवा शनि यांचा संयोग होतो, त्या वर्षी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
2010 कुंभ स्नान पर्व-
14 जानेवारी 2010 मकरसंक्रांत
15 जानेवारी 2010 मौनी अमावस्या- सूर्यग्रहण स्‍नान
20 जानेवारी 2010 वसंत पंचमी
30 जानेवारी 2010 माघ पौर्णिमा
12 फेब्रुवारी 2010 महाशिवरात्री- शाही स्‍नान
15 मार्च 2010 सोमवती अमावस्या- शाही स्‍नान
16 मार्च 2010 गुढीपाडवा- स्‍नान
24 मार्च 2010 श्रीराम नवमी- स्‍नान
30 मार्च 2010 चैत्र पौर्णिमा (पर्व स्‍नान)
14 एप्रिल 2010 मेष संक्रांत- शाही स्‍नान- मुख्‍य स्‍नान पर्व
28 एप्रिल 2010 वैशाख अधिमास पौर्णिमा
महाकुंभमेळ्याचे महत्त्व-
तब्ब्ल 535 वर्षांनंतर ग्रहांचे उत्तम योग आल्याने हरिद्वार येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथे लोखांच्या संख्येने साधु, संत, महत्त व भाविक उपस्थित झाले आहेत. तीन महिन्यांपर्यंत भाविक गंगा नदीवर पवित्र स्नान करतील. या काळात गंगा नदीवर स्नान करून यथाशक्ती प्रमाणे दानधर्म केल्याने मनाप्रमाणे फळ मिळते, मृत्यूचे भय नाहिसे होते व घरात सुख शांती नांदते.
0 comments
 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. HINDU HERALD - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger